घनकचरा व ग्रामस्वच्छता राबवणारी मसूर ग्रामपंचायत जिल्ह्यात पहिली

घनकचरा व ग्रामस्वच्छता अभियान राबवताना ग्रामपंचायतीला स्वनिधी खर्च करावा लागतो. पुणे येथील व्हिडीके फॅसिलिटी सर्विसेसने मसूर (ता. कराड) ग्रामपंचायतीला घनकचरा व्यवस्थापनांतर्गत दोन घंटागाड्या दिलेल्या आहेत. ग्रामपंचायत स्तरावर देखील अतिशय चांगल्या व सकारात्मक दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थांतील पदाधिकाऱ्यांनी काम केले तर चांगला प्रतिसाद मिळू शकतो. कारण शिक्षण, आरोग्य, ग्रामस्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन आदी मूलभूत सुविधा पुरवणारी मसूर ग्रामपंचायत सातारा जिल्ह्यात अग्रेसर आहे. जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे हे या ग्रामपंचायतीकडे बारकाईने लक्ष ठेवून असतात. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींकडून मसूर गावासाठी करावे लागणारे सर्व सकारात्मक प्रयत्न करून जिल्हा परिषद व राज्य शासनाकडून निधी मिळवून गावांमध्ये विविध विकास कामे करीत असतात.


मानसिंगराव जगदाळे यांनी अनेक वर्ष ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून काम केल्यानंतर त्यांना सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक, जिल्हा परिषदेचे सदस्यत्व मिळालेले आहे. सध्या सरपंच पंकज दीक्षित, उपसरपंच म्हणून विजयसिंह जगदाळे काम पाहत आहेत. मसूर मधील रस्ते, पथदिवे, स्वच्छते बाबत ग्रामपंचायत नेहमीच दक्ष राहिलेली आहे.ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जमिनीमध्ये व्यवसायिक गाळे निर्माण केल्यामुळे मसूर ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात भर पडलेली आहे.प्रायोगिक तत्त्वावर राबवला जाणारा ग्रामस्वच्छतेचा हा उपक्रम सातारा जिल्ह्यात पहिदांच यशस्वी प्रयोग झाला आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने वार्षिक आर्थिक बजेट तयार करून ग्रामसभेकडे मांडावे लागते. त्यात होणारी कामे, कर्मचारी खर्च यामध्ये मोठी तफावत दिसून येते. यासाठी प्रायोगिक तत्त्वाचा प्रयोग निश्चितच उपयुक्त ठरणारा आहे. कारण सातारा जिल्ह्यातील प्रत्येक मोठ्या ग्रामपंचायतीने हा उपक्रम राबविणे अत्यावश्यक आहे. कारण आर्थिक बजेटवरही याचा परिणाम दिसून येतो. यामुळे प्रायोगिक तत्त्वाच्या कामांवर सातत्याने लक्ष ठेवण्याची अत्यंत गरज आहे.


ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होणारा विकास हा जनतेकडून जमा होणाऱ्या पैशातून होत आहे. जनतेच्या पैशाचा विनियोग, उपयोग गावाच्या विकासासाठी झाला पाहिजे. हा आग्रह नेहमीच जनतेचा असतो. यासाठी ग्रामपंचायतीने प्रसंगी कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर गावांना मुलभूत सुविधा देताना पारदर्शक कारभार अत्यावश्यक ठरतो. जनतेचा विश्वास संपादन करून ग्रामपंचायतीचा कारभार करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर स्वच्छता हे प्रत्येक घरातील नागरिकांचे आद्यकर्तव्य आहे. याचा विसर पडता उपयोगाचा नाही. तर ग्रामपंचायतीने देखील स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण केली तर "स्वच्छता ज्याच्या घरी लक्ष्मी तेथे वास करी" असे नक्की होईल. मसुर ग्रामपंचायत सध्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याचा विचार करीत आहे. ही आशादायी बाब म्हणावी लागेल.कचरा निर्मिती हा सर्वांत पुढील गहन प्रश्न आहे. यावर उपाययोजना करून तो निकाली काढणे यासाठी महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती बरोबर आता ग्रामपंचायती देखील प्रयत्न करीत आहेत.